गणेश तलावातील गाळ काढा – उपमहापाैर शैलेजा मोरे यांची मागणी
पिंपरी- निगडी, प्राधिकरणातील सेक्टर 26 मधील गणेश तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला आहे. तसेच शेवाळेही आले आहे. याबाबत संबंधित अधिका-यांकडे लेखी तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करत तलावातील गाळ त्वरित काढण्याची मागणी, उपमहापौर शैलजा मोरे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले. त्यात मोरे यांनी म्हटले आहे की, निगडी, प्राधिकरणातील सेक्टर 26 मधील गणेश तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला आहे. तसेच शेवाळेही आले आहे. गाळ काण्यासाठी तीन महिन्यापूर्वीच संबंधित अधिका-यांना लेखी पत्राद्वारे कळविले होते. तसेच वारंवार तोंडी सूचना देखील दिल्या होत्या. परंतु, संबंधित अधिका-यांनी हे काम पूर्णपणे केले नाही.
आपण स्वत: याकडे लक्ष द्यावे. संबंधित अधिका-यांना तलावातील गाळ आणि शेवाळे काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत. तसेच तलावाची दर तीन महिन्यातून स्वच्छता करण्यात यावी. गणेश तलावाच्या परिसरात दाट झाडी आहे. त्यामुळे या परिसरात रोज सकाळी नागरिक तेथे फिरायला येतात. निसर्गरम्य आणि शांत वातावरणामुळे येथे कधी न दिसणारे पक्षीही दिसू लागले आहेत. हे नवीन पक्षी पाहण्यासाठी नागरिक तेथे गर्दी करत आहेत. त्यामुळे तलावात बोटींगची व्यवस्था केल्यास नागरिकांना बोटींगचा आनंद घेता येईल. त्यामुळे बोटींग सुरु करण्याचे प्रयत्न करावेत, अशीही मागणी उपमहापौर मोरे यांनी निवेदनातून केली आहे.