आणखी एका नेत्याचा तृणमूल काँग्रेसला रामराम
कोलकाता – विधानसभा निवडणुकीस अवकाश असला तरी पश्चिम भाग तृणमूल काँग्रेस पक्षाला हादरे बसायला सुरू झाली आहे. निवडणूक हळूहळू जवळ येत असताना तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा हा ममतांना मोठा धक्का मानला जात असतानाच जितेंद्र तिवारी यांनीही तृणमूलला रामराम केला. दोन नेत्यांच्या राजीनाम्याने पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मात्र त्यातच तृणमूलच्या आणखी एका नेत्याने राजीनामा दिला आहे. आमदार शीलभद्र दत्त यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिलाय. शीलभद्र दत्त यांच्यासोबत तृणमूलचे नेते कबिरूल इस्लाम यांनीही पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तेही लवकरच तृणमूल सोडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांत अनेक नेत्यांनी तृणमूल सोडल्याने ममतांची डोकेदुखी वाढली आहे.
महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याआधीच तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. त्यामुळे तृणमूलला रामराम ठोकणारे नेते भाजपात जाणार असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयामुळे अधिकारी भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.