आघाडी सरकारपेक्षा आमची कामगिरी दमदार ; मुख्यमंत्र्यांचा दावा
मुंबई : आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कामगिरीपेक्षाही आमच्या सरकारची चार वर्षांतील कामगिरी कितीतरी दमदार असल्याचा दावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबतची आकडेवारीच सादर केली. सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ते पत्रकारांशी बोलत होते. सत्तेत येताना आपण दिलेल्या व्हिजन डॉक्युमेंटमधील सगळ्या वचनांची पूर्तता केली असल्याचे ते म्हणाले.
स्टार्ट अप उद्योगांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल आल्याची आकडेवारी संसदेत सादर करण्यात आली आहे. देशातील १० हजार ९५० स्टार्टअपपैकी २१३० महाराष्ट्रात आहेत. राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी २००९ ते २००१४ या काळात केवळ ११७१ कोटींची तरतूद करण्यात आली होती. आमच्या काळात ती ४३४५ कोटी रु.असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई वगळता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना आघाडी सरकारने १२०० कोटी रुपये दिले तर आम्ही ३२०० कोटी रुपये दिले अशी तुलनादेखील त्यांनी केली. सेवा हमी कायद्यांतर्गत ५ कोटी ४७ लाख प्रकरणांमध्ये ५ कोटी ३१ लाख सेवा या वेळेत प्रदान करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
‘जलयुक्त’वर आरोप हा सामान्यांचा अपमान
जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यासाठी राज्यातील सामान्य माणसांनी ६०० कोटी रुपयांचे योगदान दिले. अशा योजनेवर टीका हा सामान्य माणसांचा अपमानच आहे. या योजनेतून झालेल्या एकेक कामांचा डाटा माझ्याकडे आहे. तो केव्हाही देण्याची माझी तयारी आहे, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले.
आमच्याकडे चार चार जीआर आहेत
राज्यात यंदा दुष्काळ भीषणच आहे. पिके व चाऱ्याची परिस्थिती चांगली राहील पण पिण्याच्या पाण्याचे भीषण दुर्भीक्ष्य राहील, असे दिसते. त्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केल्याबद्दल विरोधक ओरडतात. त्यांच्या कार्यकाळात दुष्काळ हा शब्द गायब करून टंचाईसदृष्य हा शब्द वापरण्यात आला होता. त्याचे चार-चार जीआर आमच्याकडे आहेत, असा प्रतिहल्ला मुख्यमंत्र्यांनी केला.