आंगणवाडी कर्मचारी आणि आशा सेविकांच्या मानधनवाढीची राज्यसभेत मागणी
नवी दिल्ली – आंगणवाडी कर्मचारी आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ करा, अशी मागणी बिजू जनता दलाचे खासदार सुभाष चन्द्र सिंह यांनी आज राज्यसभेत शून्य तासाच्या चर्चेत केली. सध्या देशात कोरोनाचे संकट असतानाही हे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, असे ते म्हणाले.
आंगणवाडी कर्मचार्यांना ४ हजार ५०० आणि अशा सेविकांना २ हजार ५०० रुपये एवढे मानधन दिले जाते. हे कर्मचारी कोरोनाच्या संकटकाळात अथक परिश्रम घेऊन काम करत असताना त्यांना दिले जाणारे हे मानधन म्हणजे त्यांचे विडंबन आहे, असे सुभाषचंद्र सिंह यांनी सांगितले. ओडिशा राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा दिला आहे. परंतु तो पुरेसा नाही. त्यामुळे केंद्र सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन १५ हजार आणि आशा सेविकांचे मानधन १० हजार रुपये करावे. अशी मागणी त्यांनी केली. या कर्मचाऱ्यांसाठी केंद्राने विशेष पॅकेज जाहीर केले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.