‘असं करू नका, हात जोडून विनंती आहे!’ ; फडणवीसांचे ठाकरेंना आवाहन
मुंबई : मेट्रो कारशेडच्या उभारणीसंदर्भात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (२० डिसेंबर) राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबद्दल विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे.
“प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा आहे! श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही. पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला,” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
वाचाः शेतकरी आंदोलनाला समर्थन, हनुमान बेनीवील यांचा तीन संसदीय समित्यांचा राजीनामा
“३० मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. या समितीनेच सांगितले की, कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल.
शिवाय चार वर्षांचा विलंब वेगळा Red exclamation mark symbol कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवता?,” असा प्रश्न फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.
“बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ ८०%पूर्ण होत आहे. आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा व वेळ दोन्ही वाया जाणार! मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे!,” असं आवाहन फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केलं आहे.