अवैध मद्य व्यवसायावरील नियंत्रणासाठी ग्रामरक्षक दल स्थापन करा – वळसे पाटील
मुंबई | महाईन्यूज
राज्याच्या ग्रामीण भागात अवैध मद्यनिर्मिती व मद्यविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसहभागातून स्थानिक पातळीवर ग्रामरकक्ष दलाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहावे, असे निर्देश उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी दिले आहेत. पाटील यांनी खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तालयात बैठक घेऊन खात्याचा आढावा घेतला व महसूलवृद्धीसाठी निर्देश दिलेले आहेत.
ग्रामरक्षक दल अधिकाधिक प्रमाणात स्थापन होण्यासाठी उत्पादन शुल्कच्या विभागीय आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना पत्र लिहावे. २६ जानेवारी रोजी होणा-या ग्रामसभेच्या विषय सूचीमध्ये ग्रामरक्षक दल स्थापनेचा विषय समाविष्ट करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाची संरचना, आस्थापना, नियम, विविध अनुज्ञप्त्या, कार्यपद्धती, महसूल, मद्यविक्री, गुन्हा अन्वेषण याबाबत मंत्र्यांनी चर्चा केली. या वेळी विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, आयुक्त प्राजक्ता वर्मा व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.