अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून तरुण मंडळी बॉलिवूडची कोडी सोडवण्यात मग्न – चेतन भगत
नवी दिल्ली | देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे या पडत्या अर्थव्यवस्थेवर अनेक तज्ज्ञांनी आपली मतं व्यक्त केली. त्यावर आता प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीही कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात भाष्य केलं आहे. आपले तरुण अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन बॉलिवूडमधील कोडी सोडवत बसले आहेत, असं चेतन भगत म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
चेतन भगत मुलाखतीत म्हणाले, “देशातील जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. आपले तरुण तर अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन बॉलिवूडमधील कोडी सोडवत बसले आहेत. कुठलंही सरकार असू द्या त्यांना माहिती आहे की लोकांना अर्थव्यवस्थेची फिकीर नाही. त्यामुळेच ते देखील अर्थव्यवस्थेतील संकटं दूर करण्यासाठी वेळ खर्च करीत नाहीत. जर लोकांनाच अर्थव्यवस्थेची काळजी नाही, त्यांनी याबाबत मागणीच केली नाही तर राजकारणी लोक तरी याची काळजी का करतील?” असा सवाल भगत यांनी केला आहे.
देशातील सध्याच्या ठप्प झालेल्या रोजगाराच्या स्थितीवर बोलताना चेतन भगत म्हणाले, “पुढील वर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या किती मुलांना सुरक्षित नोकऱ्या मिळणार आहेत? एकतर त्यांना बॉलिवूडच्या केसेस सोडवत बसावं लागेल किंवा आपल्याला नोकरी कशी मिळेल? याचा विचार करण्यात त्यांचा वेळ जाईल.”