अर्णब गोस्वामी अटकेप्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नीने मानले पोलिसांचे आभार
मुंबई – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली. या कारवाईनंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक आणि मुलगी आज्ञा यांनी पत्रकार परिषद घेऊन या अटकेप्रकरणी पोलिसांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर ‘सुशांतसिंह राजपूतची सुसाईड नोट नव्हती, मात्र माझ्या वडिलांच्या सुसाईड नोटमध्ये अर्वब गोस्वामी यांचं नाव आहे’, तरीही कारवाई का केली गेली नाही? असा सवाल नाईक यांच्या मुलीने उपस्थित केला आहे.
अन्वय नाईक यांच्या मुलीने पत्रकार परिषदेत अर्णब गोस्वामी यांच्यावर गंभीर आरोप केला. अर्णब गोस्वामी यांनी ६ कोटी ४० लाखांपैकी ८३ लाख रुपये अद्याप दिलेले नाहीत. माझ्या वडिलांच्या आणि आजीच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामीच जबाबदार आहेत, असा आरोप आज्ञा नाईक यांनी केला आहे. तसेच ‘अर्णब गोस्वामी यांनी पैसे बुडवल्याने माझे पती नवा प्रकल्प हाती घेऊ शकले नाहीत आणि त्यांनी आत्महत्या केली. आम्ही तक्रार केल्यानंतर धमक्या देण्यात आल्या. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला’, असा गंभीर आरोप नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केला आहे. रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी आम्हाला सातत्याने तपास सुरू असल्याचे सांगितले पण त्यात कुठलीही प्रगती झाली नाही, अशी खंतही नाईक कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केली.
तसेच ‘२०१८ हे वर्ष आम्ही कधीच विसरू शकत नाही. आज महाराष्ट्र पोलिसांनी जो दिवस आणलाय त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. सुसाईड नोटमध्ये नाव असूनही त्यावेळी कारवाई करण्यात आली नाही. पण आज ती केली आहे म्हणून पोलिसांचे आभार मानते’, या शब्दात अक्षता नाईक यांनी आभार मानले. तसेच ‘कोव्हिड व्हायरस नाही तर अर्णब गोस्वामी नावाचा हा व्हायरस आहे’, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
‘सुसाईड नोटमध्ये फिरोज शेख, अर्णब गोस्वामी यांचं नाव होतं. तरीही त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. अर्णब गोस्वामी यांनी मुद्दाम रक्कम परत दिली नाही’, असा आरोप अक्षता नाईक यांनी यावेळी केला. त्याचबरोबर पैसे देणारच नाही कसे मिळतील बघतोच अशी धमकीदेखील अर्णब गोस्वामीने दिल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मुलीचं करिअर बरबाद करेल अशी धमकी फिरोज आणि अर्णब गोस्वामी यांनी दिली होती. अर्णव गोस्वामीचं स्टेटमेंट तेव्हा रेकॉर्ड झालं होतं. Joint cpच्या ऑफिसमध्ये रेकॉर्ड झालेलं, तरी इतकं प्राधान्य अर्णब गोस्वामीला का? असा सवालदेखील यावेळी उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, २०१८ साली अन्वय नाईक यांनी रिपब्लिक चॅनलचे इंटिरिअरचे काम केले होते. त्यावेळी कामाचे पैसे न दिल्यामुळे नाईक यांनी आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी अर्णब गोस्वामीच्या नावाचा उल्लेख केला होता. याप्रकरणी आज अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. या संदर्भात आज अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.