‘अमित शाहांसोबत झालेली भेट राजकीय नव्हती; सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही’- देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली | राजस्थानमध्ये राजकीय वादळ सुरू असताना महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले आहेत. या ठिकाणी फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. फडणवीस यांच्यासोबत आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच भाजप नेते हर्षवर्धन पाटील होते.
या भेटीनंतर दिल्लीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, ही भेट राजकीय नव्हती. ‘केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत झालेली भेट राजकीय भेट नव्हती. सरकार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न नाहीत आणि रसही नाही, अंतर्विरोधाचे हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचे. सध्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, यासाठी ही भेट होती. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचे महाराष्ट्रातील कोरोनास्थितीवर लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ मिळाली तर त्यांचीही भेट घेऊन महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची माहिती देईन, काय करता येऊ शकतं याची माहिती देईन’, असे फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, ‘यंदा महाराष्ट्रात ऊसाचे पीक वाढले, शेतकऱ्यांना FRPआणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो, अमित शाह यांची भेट घेतली. ऊस आणि साखर कारखान्यांबाबत कृषी मंत्र्यांचीही भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदतीची मागणी करणार आहोत.’