अपघातानंतर पीएमपीएमएल प्रशासनाला जाग
- ताफ्यातील ठेकेदारांच्या सर्व बसेसची पथकामार्फत होणार तपासणी
पुणे – वारजे पुलावर झालेल्या बस अपघातानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ठेकेदाराकडून चालवण्यात येणाऱ्या सर्व बसेसची तपासणी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरातील सर्व डेपोंना सूचना देण्यात आल्या आहेत. 10 तारखेपर्यंत सर्व गाड्यांची तपासणी करून प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले आहे. यासाठी डेपोमध्ये एक पथक तयार करण्यात आले आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर वारजेला जाणाऱ्या जोड रस्त्यावर सोमवारी पीएमपीची बस पुलावरून कोसळून अपघात झाला. यामुळे बसमधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अपघातानंतर पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रशासनाला जाग आली आहे. यानंतर तातडीने पाऊले उचलत ठेकेदारांच्या गाड्यांची तपासणी करण्याचे सांगण्यात आले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात 2 हजार 33 बसेस आहेत. यापैकी 1440 बसेस पीएमपीच्या मालकीच्या तर 653 बसेस या ठेकेदाराकडून भाडेतत्वावर चालवल्या जातात. या बसेसमध्ये ब्रेकडाऊनचे प्रमाण अधिक आहे; तर छोटे-मोठे अपघातही सातत्याने होतात. सोमवारी झालेल्या अपघातामध्ये बसच्या स्टेअरिंगचा रॉड निसटल्याचे तोल जाऊन अपघात झाल्याने प्रथमदर्शनी अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे या बसच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. ठेकेदारांकडून चालवण्यात येणाऱ्या बसेसच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न कायम चर्चेत असतो; पण प्रशासनाकडून हवी तशी कारवाई होत नाही. या अपघातानंतर प्रशासन गंभीर झाले असून बुधवारपासून सर्व बसेसची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
—————
बसेसचे आरटीओ पासिंग, ठरावीक दिवसांनी होणाऱ्या तपासण्या, सर्व्हिसिंग, ब्रेक, क्लच, गिअर, स्टेअरिंग, टायर यांच्या फिटनेसकडे लक्ष दिले जाणार आहे. यासाठी सर्व डेपोंना सूचना देण्यात आल्या आहेत. डेपो मॅनेजर, वरिष्ठ ड्रायव्हर, अभियंता आदींचे पथक तयार करण्यात आले असून यांच्याकडून सर्व गाड्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीनंतर गाडी मार्गावर सोडण्यात येणार असून तपासणीमध्ये काही दोष आढळल्यास ती गाडी थांबून ठेवली जाणार असल्याचे पीएमपीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.