अद्रमुकच्या 18 आमदारांच्या अपात्रतेबाबत हायकोर्टामध्ये मतभिन्नता
- पलानीस्वामी सरकारला दिलासा
चेन्नई – अद्रमुकच्या 18 आमदारांच्या अपात्रतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयामध्ये आज न्यायाधीशांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली. अद्रमुक पक्षातून हटवण्यात आलेल्या टीटीव्ही. दिनाकरन यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या आमदारांना विधानसभेतील सभापती पी. धनपाल यांनी अपात्र ठरवले होते. त्या निर्णयाला या आमदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या याचिवरच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांनी 18 सप्टेंबरला सभापतींनी दिलेला आदेश वैध ठरवला. तर न्या. एम सुंदर यांनी मात्र या निर्णयाशी असहमती दर्शवली. त्यामुळे या प्रकरणी उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांनंतरच्या दुसऱ्या क्रमांकाच्या ज्येष्ठ न्यायाधीशाकरवी तिसऱ्या न्यायाधीशांची नियुक्ती केली जाणार आहे, असे न्या. बॅनर्जी यांनी सांगितले.
पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवत या आमदारांनी गेल्यावर्षी 22 ऑगस्टरोजी राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे सभापतींनी या आमदारांना अपात्र ठरवले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये मतभिन्नता आढळल्याने के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अद्रमुक सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या स्थिरतेला निर्माण होणारा संभाव्य धोका सध्या तरी टळला आहे.