अत्यावश्यक सेवेत हजर राहण्याचे बंधन न पाळणाऱ्या 57 कामगारांना केलं बडतर्फ; तर,आतापर्यंत सुमारे 4 हजार कामगारांना नोटीस
लॉकडाऊन कालावधीत बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष सेवा चालवल्या होत्या. त्यासाठी कामगारांना कामावर येण्याची सूचना केली होती. याच पार्श्वभूमिवर बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेत हजर राहण्याचे बंधन न पाळणाऱ्या ५७ कामगारांना आतापर्यंत बडतर्फ केल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत सुमारे ४ हजार कामगारांना नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक भरणा हा चालक, कंडक्टर यांचा आहे. मात्र ही कारवाई अयोग्य असून कामगारांवर करण्यात येणारी कारवाई मागे घेण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे.
लॉकडाऊन कालावधीत बेस्ट उपक्रमाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष सेवा चालविल्या होत्या. त्यासाठी कामगारांना कामावर येण्याची सूचना केली होती. परंतु काही कारणांनी अनेक कामगार हजर राहू शकले नव्हते. ते लक्षात घेत उपक्रमाने नुकतीच कारवाई हाती घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या कारवाईची तीव्रता वाढविली आहे. अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करताच बेस्टने सर्वांसाठी बससेवा खुली केली. त्यामुळे, बससेवांची संख्या वाढून मुंबईकरांनाही त्याचा फायदा झाला. मात्र, या सर्व कालावधीत सेवा न बजावू शकणाऱ्या कामगारांविरोधात उपक्रमाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे.
बेस्टच्या सुमारे ८०० कामगारांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त कामगार कोरोनामुक्त झाले आहेत. एकीकडे कोरोनाग्रस्त कामगारांची संख्या वाढत असताना त्यांच्यासाठी कोणत्याही वैद्यकीय सुविधा पुरविल्या जात नसल्याचा गंभीर आरोप बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी केला आहे.