अडीचशे दहशतवादी मारले गेल्याचे श्रेय घेण्यात मोदी मागे का – मायावती
भारताने पाकिस्तानात केलेल्या हवाई हल्ल्यात अडीचशे दहशतवादी मारले गेले असे जर भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे म्हणणे आहे तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याबाबत गप्प का, असा सवाल बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केला आहे.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यात अडीचशे दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला असताना त्यांचे गुरू असलेले पंतप्रधान मोदी नेहमी श्रेय घेण्यात पुढे असताना यात मागे का, असा सवाल मायावती यांनी ट्विटरवर केला आहे.
अहमदाबाद येथे अमित शहा यांनी असे म्हटले होते की, पाकिस्तानमधील बालाकोट येथे गेल्या मंगळवारी भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात अडीचशेहून अधिक दहशतवादी मारले गेले होते.
मायावती यांनी सांगितले की, भाजप सरकारने देशाची आर्थिक प्रगती झाल्याचा दावा केला असला तरी तो खरा नाही. १३० कोटी लोकसंख्येतील शेतकरी, मजूर, गरीब लोक यांना कुठलेही फायदे मिळाले नाहीत ही गंभीर बाब आहे.
कृषी व उत्पादन क्षेत्रात वाढ मंदावली आहे, एकूण आर्थिक वाढ ६.६ टक्क्य़ांच्याही खाली जाण्याची शक्यता आहे असे असताना त्यावर मोदी सरकारचे उत्तर केवळ जुमलेबाजी हेच आहे.