अजित पवारांना धक्का; राजभवनावर गेलेले काही आमदार पुन्हा राष्ट्रवादीकडे
मुंबई | राज्यात युती तुटल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडी जोरादार झाल्यात. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची सत्तास्थापन करण्यासाठी महाविकासआघाडी झाली. काल अंतिम चर्चा झाल्यानंतर आज पुन्हा चर्चा होऊन सत्तास्थापन करण्याचा दावा करण्यात येणार होता. मात्र, एका रात्रीत नाट्यमय घडामोडी होऊन सकाळी ८ वाजता राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या सहकार्याने भाजपचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी राजभवनावर अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदार होते. मात्र, यातील काही आमदारांनी अजित पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी आणि शरद पवारांसोबत राहण्याचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आणि महाविकासआघाडीला धक्का देणाऱ्या अजित पवार यांना हा जोरदार धक्का आहे.
१३ पैकी सात आमदार माघारी परतले असून सहा आमदार पक्षाच्या संपर्कात नाहीत. ते अजित पवार यांच्यासोबत राहीले आहेत. काल रात्री १२ वाजता आम्हाला फोन आला. सकाळी सात वाजता धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर या. महत्त्वाचं बोलायचं आहे, असं सांगण्यात आलं. नेत्यांचा फोन असल्यामुळं आम्ही गेलो. १०-१५ मिनिटांत तिथं आणखी काही आमदार आले. अजितदादा तिथं नव्हते. थोड्या वेळानं चर्चा करायला जायचं आहे असं सांगून आम्हाला राजभवनावर नेण्यात आलं. छोट्याशा हॉलमध्ये बसवण्यात आलं. तोपर्यंत आम्हाला काहीही माहीत नव्हतं. प्रवासात आम्ही आपसांत चर्चा केली. पण कुणालाही कशाचाही थांगपत्ता नव्हता. आमची चर्चा सुरू असतानाच तिथं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व भाजपचे काही नेते आले. त्यानंतर शपथविधी झाला. आम्ही सगळे अतिशय अस्वस्थ होतो. तिथून थेट निघून साहेबांकडं आलो आणि त्यांच्याशी बोललो. आम्ही पक्षासोबतच आहोत.