महाराष्ट्रातील क्रीडापटूंसाठी खुशखबर; राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारण्यासाठी एक समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण युवक कल्याण व क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी दिली. हे पुरस्कार राज्य सरकारतर्फे दिले जातात. ही समिती या पुरस्कारांमध्ये सर्व खेळांचा समावेश व्हावा यासाठीही अभ्यास करणार आहे. या समितीला अहवाल देण्यासाठी पंधरा दिवसांंची मुदत देण्यात आली आहे.
क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींना राज्य शासनातर्फे दरवर्षी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या पुरस्कारांमध्ये ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, एशियन गेम्स व्यतिरिक्त अन्य खेळांचाही समावेश व्हावा, अशी मागणी गेली अनेक वर्ष करण्यात येत होती. या पुरस्कारांसाठी आजपर्यंत केवळ ३९ क्रीडा प्रकार विचारात घेतले जात होते. त्यामध्ये वाढ करून सर्व क्रीडा प्रकारांना सर्वसमावेशक हे पुरस्कार असावेत, अशी क्रीडाप्रेमींची मागणी होती. तसेच ऑलिम्पिक खेळातील पुरस्कार चक्राकार पद्धतीने दिले जात होते. त्याऐवजी ऑलिम्पिक खेळांना प्रतिवर्षी पुरस्कार दिला जावा, अशीही मागणी करण्यात येत होती.
गिर्यारोहणामध्ये शिखराची उंची निश्चित करावी, याबाबतही काही सूचना सरकारकडे आल्या होत्या. संघटक आणि एकलव्य पुरस्कारांबाबतदेखील काही सूचना नव्याने सरकारकडे क्रीडाप्रेमींनी केला होत्या. पॅराऑलम्पिकमध्ये असलेल्या सर्व खेळांचा शिवछत्रपती पुरस्कारात समावेश करण्यात यावा, अशीही मागणी या क्रीडा प्रकारातून करण्यात येत होती. तसेच ही सर्व प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी स्पोर्ट्स पोर्टल अद्ययावत करावे, अशी सूचनाही वारंवार क्रीडा प्रेमींकडून सरकारला प्राप्त झाली होती.
या सर्व बाबी विचारात घेऊन शालेय शिक्षण व क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी आज या बाबत तज्ञांची समिती गठीत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ही समिती येत्या आठ दिवसात गठीत करण्यात यावी आणि या समितीला आपला अहवाल देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.