अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत कुलगुरूंची महत्वाची बैठक
मुंबई – राज्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागणार असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानंतर विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलुगुरूंशी चर्चा केल्यानंतर आज (३० ऑगस्ट) पुन्हा एकदा कुलगुरू समितीची बैठक सुरु आहे. यामध्ये परीक्षा कधी घेण्यात याव्यात ? त्या कशा पद्धतीने घेतल्या जाव्यात? या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जात असून या बैठकीतील निर्णयाचा अहवाल तयार करून राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय परिक्षेबाबत घेतला जाणार आहे.
कालच्या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षासंबंधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली ६ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. दोन संचालक सुद्धा या समितीमध्ये असतील. ही समिती पुन्हा एकदा या परिक्षांबाबत बैठक घेत असून काही महाविद्यालयातील प्राचार्यांशी सुद्धा याबाबत सूचना घेणार असल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर एक अहवाल ही समिती तयार करणार असून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चाकरून निर्णय घेतला जाईल.