भाजप-शिवसेनेला डच्चू, शांतीगिरी महाराजांचा हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा

औरंगाबाद- महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी औरंगाबादमधून अपक्ष उमेदवार असलेल्या शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिलाय. वेरूळच्या मठात भक्त परिवाराने याबाबतची घोषणा करून माहितीला दुजोरा दिला. तत्वाच्या आधारावर हर्षवर्धन यांना पाठिंबा देत असल्याचे भक्तांनी सांगितले. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद तालुक्यासह जिल्ह्यातही शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
हर्षवर्धन जाधव हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई असतात. पण ते त्यांच्या राजीनाम्यांमुळे जास्त चर्चेत राहतात. विविध मुद्द्यांवर त्यांनी अनेकदा राजीनामानाट्य त्यांनी केले आहे. स्वतःची संघटना स्थापन करत ते आता निवडणुकीत उतरले आहेत. आधी मनसेत असलेल्या हर्षवर्धन पाटलांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला. पण तिथेही त्यांच स्थानिक नेत्यांशी जमलं नाही. त्यामुळे ते आता अपक्ष निवडणूक लढत आहेत.
कोण आहेत शांतीगिरी महाराज?
शांतीगिरी महाराज हे वेरूळ मठाचे मठाधिपती आहेत. शांतीगिरी महाराज यांनी 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महाराजांनी तब्बल 1 लाख 48 हजार मते मिळवली होती. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाराज तब्बल दहा वर्षे निवडणुकीपासून लांब होते. पण यावर्षी बाबांनी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठीही प्रयत्न केला होता, पण युती झाल्यानंतर महाराजांचा अपेक्षा भंग झाला.
औरंगाबादमध्ये लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील, काँग्रेसकडून सुभाष झांबड आणि शिवसेना-भाजप युतीकडून चंद्रकांत खैरे हे उमेदवार आहेत. शांतीगिरी महाराजांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, पण हिंदू मतांचे विभाजन होऊ नये म्हणून त्यांनी माघार घेतली. आपण कुणाला मदत करणार हे स्पष्ट नसले तरी हिंदू मतांचे विभाजन न झाल्यास त्याचा थेट फायदा चंद्रकांत खैरे यांनाच आहे. पण आता शांतीगिरी महाराजांनी हर्षवर्धन जाधवांना मदत करण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे खैरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.