प्रगती मंचाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद

- 10 लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूकीच्या प्रकल्पांचा आढावा
नवी दिल्ली – गतीशील प्रशासन आणि वेळेत अंमलबजावणीच्या दृष्टीने स्थापन “प्रगती’ मंचाच्या 26 व्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी संवाद साधला. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत प्रगतीच्या 25 बैठका झाल्या असून, त्यात 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या 227 प्रकल्पांचा समग्र आढावा घेण्यात आला आहे. विविध क्षेत्रांमधील तक्रार निवारणासाठीच्या संदर्भातही या बैठकांमध्ये आढावा घेण्यात आला.
काल 26 व्या बैठकीत पंतप्रधानांनी टपाल कार्यालय आणि रेल्वेतील तक्रारी हाताळणे आणि त्यांचे निरसन याच्या प्रगतीचा आढावा घेतला. टपाल आणि रेल्वे जाळ्याच्या माध्यमातून विशेषत: “भीम ऍप’चा वापर करुन डिजिटल व्यवहार वाढविण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.
रेल्वे, रस्ते, पेट्रोलियम आणि ऊर्जा क्षेत्रातील 9 पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा पंतप्रधानांनी आढावा घेतला. महाराष्ट्रासह, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, ओदिशा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश मध्ये हे प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पांमध्ये “वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’ आणि “चारधाम महामार्ग विकास परियोजने’चा समावेश आहे.
अमृत मोहिमेच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचाही पंतप्रधानांनी आढावा घेतला. तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था परिचालनाच्या समग्र संगणकीकरण कार्यक्रमाचा आढावाही पंतप्रधानांनी घेतला.