breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सर्वपक्षीय बैठक संपली, रणनीती ठरली?
नवी दिल्ली – पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. केंद्र सरकारने आज तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. देशभरातील विविध पक्षांचे महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, शिवसेना खासदार संजय राऊत, रामविलास पासवान यासरह अनेकांचा समावेश होता.
आता पंतप्रधानांनीही सर्वपक्षीय बैठकीचं नियोजन करावं, अशी मागणी काँग्रेसने केली. सर्व देश दु:खात बुडाला आहे, त्यामुळे पंतप्रधानांनीही पुढील दिशा ठरवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी असं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं.
या बैठकीत सरकारकडून पुलवामा हल्ला, त्यानंतरच्या घडामोडी आणि पुढे केली जाणारी संभाव्य कारवाई, याबाबत तपशीलवार चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं गुरुवारी 14 फेब्रुवारीला भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारताचे 37 जवान शहीद झाले. शहीद जवानांवर त्यांच्या मूळगावी आज अंत्यसंस्कार होणार आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील बुलडाण्याचे दोन जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ असं ठणकावलं आहे.
दरम्यान, जम्मू काश्मीर मध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा कर्फ्यू लावण्यात आला आहे. तिथे 144 कलम लागू करण्यात आलं आहे. 14 तारखेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जम्मूत सर्व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून दहशतवादी हल्ल्याचा स्थानिकांनी निषेध केलाय. तसंच गुजर नगर चौकात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहे.