श्री साईबाबा हे ब्रम्हांडनायक ईश्वराचे मानवी रुप – केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले
पिंपरी ( महा ई न्यूज ) – साईबाबा हे तर ब्रम्हांडनायक ईश्वराचे मानवी रुप आहे, सर्व मानवजातीला त्यांनी प्रेम, श्रध्दा, भक्ती, सबुरी व मानवतेचा संदेश दिला. त्यासाठी सर्वांनी साई बाबांचा संदेश पुढे नेण्याचा प्रयत्न भाविकांनी करावा, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
आळंदी रोडवरील वडमुखवाडी येथील साई मंदिरात श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त 10 ते 19 ऑक्टोंबर दरम्यान साईबाबा महासमाधी शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांसह जागतिक स्तरावरील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या महोत्सवातील मुख्य कार्यक्रम महोत्सावाचे उद्घाटन केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग, केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर राहुल जाधव, डॉ. चंद्रभानू सत्पथी, साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे, शिवकुमार नेलगे उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, सत्य, धर्म, शांती, जात, पात आणि प्रेमाच्या आधाराने वागल्यास आपल्या सर्वांचा व देशाचा उत्कर्ष होऊ शकेल. सत्य नेहमी आचरणात आणा. सर्व धर्म समान असून इतर घर्मांचा आदर करा. अहंकार सोडून द्या. साई बाबा देवस्थानसाठी जी काही मदत लागेल, ती सरकारच्या माध्यमांतून करण्यात येईल. असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.