पीएचडी, एमफिलच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन पुन्हा सुरू करा
- अधिसभा सदस्यांची मागणी : 15 दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलन
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएचडी किंवा एमफिल करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने काही दिवसांपूर्वीच घेतला होता, त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यावेतन विद्यापीठाने पुन्हा सुरू करावे अशी मागणी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी केली आहे. हे विद्यावेतन 15 दिवसांत पुन्हा सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांकडून देण्यात आला आहे.
याबाबत अधिसभा सदस्य दादाभाऊ शिनलकर, प्रा. शामाकांत देशमुख, प्रा. डॉ. संजय खरात, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, डॉ. नितीन वाघ, अभिषेक बोके, विश्वनाथ पडवी, अनिल तिखे आदी सदस्यांनी ही मागणी केली. याबाबत विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर यांना पत्र लिहून याबाबतची मागणी करण्यात आली आहे. या पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे, एमफिल व पीएचडी करणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. यातील अनेक दलित व आदीवासी समाजाचे आहेत. विद्यापीठाकडून विद्यार्थी हिताचे निर्णय घेणार असे सांगितले जात असताना अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या विरोधातील निर्णय कसे काय घेतले जात आहे? असा प्रश्नही या पत्रात उपस्थित केला आहे. दरम्यान 15 दिवसांत विद्यावेतन पुन्हा सुरू केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.