देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव
पिंपरी – प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला वाजपेयी यांचे नाव दिल्यास त्यांना ख-या अर्थाने आदरांजली असेल, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज (गुरुवारी) दिल्ली येथे दीर्घ आजाराने निधन झाले. संपूर्ण भारत त्यांच्या निधनाने शोकाकुल झाला आहे. राजकारणातील निष्ठावान नेता हरविल्याची भावना संपूर्ण भारतातून व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनामुळे देशभर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले, “देहू-आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केंद्र सरकार, राज्य शासन आणि महापालिका या सर्वांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाला भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे इंद्रायणी नदी तीरावर असलेल्या आणि इंद्रायणी नदीच्या पाण्यावर विसंबून असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेकडून सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदार संघात नमामि गंगा प्रकल्पाच्या सल्लागारांची नेमणूक देहू आळंदी इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचे सल्लागार म्हणून करण्यात आली आहे. त्यांचे सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या एक-दोन महिन्यात त्यांचे काम पूर्ण होईल. सल्लागार त्यांचा अहवाल महापालिकेकडे सुपूर्द करतील. त्यानंतर तात्काळ या प्रकल्पावर प्रत्यक्ष काम सुरु होणार आहे. या स्तुत्य प्रकल्पाला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणे, हीच त्यांना ख-या अर्थाने पिंपरी-चिंचवडकरांकडून आदरांजली असेल, असेही लांडगे म्हणाले.