कासारसाई अत्याचार : पालकमंत्री बापट यांचा बोलण्यास नकार, कार्यक्रमातून घेतला काढता पाय
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कासारसाई येथे दोन मुलींवर पंधरा दिवसांपूर्वी बलात्काराची घटना घडली. यातील गुन्हेगारांना कोणत्या प्रकारची शि क्षा देणार आणि पीडित मुलींच्या कुटुंबियांचे पुढे काय, असा प्रश्न विचारला असता पालकमंत्री गिरीश बापट यांनी जबाबदारी धुडकावत या विषयावर बोलण्यास नकार दिला. या प्रश्नांवर बोलण्यासाठी वेळ नसल्याचे दाखवत त्यांनी प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरून काढता पाय घेतला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत चिखली पोलीस ठाण्याचे उद्घाटन पालकमंत्री बापट यांच्या हस्ते आज बुधवारी (दि. 10) झाले. कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री बापट यांना कासारवाई येथील दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराशी संबंधीत प्रश्न विचारला. तसेच, पिंपरी येथील एचए मैदानावर आढळून आलेल्या अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृतदेहाच्या संदर्भात त्यांना विचारणा करण्यात येणार होती. परंतु, कासारसाई येथील अत्याचाराच्या प्रकरणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. ही पत्रकार परिषद नसून हा उद्घाटन सोहळा आहे, असे म्हणत त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोरून काढता पाय घेतला.
पालकमंत्री या नात्याने बापट यांनी या विषयांवर घटना घडल्यापासून आजतागायत चक्कार शब्द उच्चारलेला नाही. जबाबदार व्यक्तीमत्व म्हणून बापट यांनी बोलणे अपेक्षीत होते, त्यांनी जबाबदारी झटकली असल्याचा आरोप देखील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर आज देखील त्यांनी बोलण्यास नकार दिल्याने बापट हे आपल्या भूमिकेपासून का पळ काढत आहेत, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.