कलम 377 बाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून राखीव
नवी दिल्ली – भारतीय दंड संहितेतील 377 व्या कलमाची घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज राखून ठेवला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापिठापुढे सुरू असलेल्या या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंकडील युक्तीवाद आज चौथ्या दिवशी समाप्त झाला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा 2 ऑक्टोबरला निवृत्त होत आहेत. या प्रकरणावरील निकाल त्यापूर्वीच म्हणजे 2 ऑक्टोबरपूर्वी दिला जाईल.
कलम 377 हे अनैसर्गिक लैंगिक संबंधांशी संबंधित असून अशा गुन्ह्यासाठी जन्मठेप किंवा तुरुंगवास किंवा 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय संबंधित व्यक्ती दंडासही पात्र असेल. अशा संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या या कलमाला नृत्य कलाकार नवतेज जौहर, पत्रकार सुनिल मेहरा, शेफ रितू दालमिया, हॉटेल व्यवसायिक अमन नाथ, केशव सुरी आणि उद्योग एक्झिक्युटिव्ह आयेशा कपूर यांच्यासह आयआयटीच्या 20 आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.