आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचा ‘घरवापसी’ला नकार
- पाच राज्याच्या निकालाने भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता
- राजकीय क्षेत्रात घरवापसीच्या चर्चेला आले उधान
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राजस्तान, मध्यप्रदेश, मिझोरम, तेलंगणा आणि छत्तीसगढ या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची धुळधाण उडाल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्या नेत्यांचे राजकीय भवितव्य अंधारात दिसत आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या भूमिकेबाबत राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क लढविले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत भाऊ आणि दादांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. तथापि, दोन्ही आमदारांनी भाजप सोडून दुस-या कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे जाहीर केले आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकाप, मनसेचा पाठिंबा घेऊन मावळ मतदार संघातून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाल्याने त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा करिश्मा ओळखून भाजपचे तिकीट आणले. तर, राष्ट्रवादीने तिकीट नाकारल्याने महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा अपक्ष लढविली. माजी आमदार विलास लांडे यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळानंतर नागरिकांच्या मनात निर्माण झालेली नाराजी व्यक्त झाल्याने लांडगे यांचा विजय झाला. आता राजस्तान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मिझोरण आणि तेलंगणा या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल काँग्रेसच्या बाजुने लागल्याने भाजप नेत्यांची पाचावर धारण बसली आहे. आपले राजकीय भवितव्य अंधारात दिसू लागल्याने त्यांची आतापासुनच चुळबूळ सुरू झाली आहे.
या पाच राज्यांच्या निकालावरून आमदार जगताप आणि लांडगे आगामी विधानसभा निवडणुकीत घरवापसी करणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. त्यातच राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांनी भाजपचे काही खासदार, आमदार आमच्या संपर्कात असल्याचे जाहीर केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील भाजपचे नेते आमच्या पक्षात येण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या नेत्यांच्या यादीमध्ये शहरातले नेते जगताप आणि लांडगे यांची नावे तर नाहीत ना, असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला आहे. तथापि, दोन्ही आमदारांनी आम्ही भाजप सोडून अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. परंतु, यावर नागरिकांना विश्वास कसा बसणार, हा प्रश्न आहे.