दहीहंडीला पाऊस परतला, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणे : ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. आता सप्टेंबर सुरु होताच पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळू हळू वायव्येकडे सरकत आहे. यामुळे राज्यात कृष्ण जन्माष्टमीला मॉन्सून सक्रिय झाला आहे. राज्यात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
हेही वाचा – मनोज जरांगे-पाटील उपोषणावर ठाम! जीआरमध्ये सुधारणा करण्याची मागणी!
राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात पाऊस सुरु झाला आहे.