मावळातील साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला अजित पवार येणार की टाळणार?
मराठा आरक्षण, मावळात राजकीय नेत्यांना गावबंदी, अजित पवारांनादेखील विरोध होण्याची शक्यता...
वडगाव मावळः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध पातळ्यांवर राज्यभरात सुरू असलेले आंदोलन आणि राजकीय नेत्यांविरोधातील संताप तीव्र होत आहे. उपोषण, मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाच्या मागणील बळ देतानाच राजकीय नेत्यांविरोधात गावबंदीचे तट अधिकच भक्कम होऊ लागले आहेत. बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी होणार होता. मात्र, मराठा क्रांती मोर्चाने अजित पवार यांना कारखान्यात येण्यास विरोध केला असून, आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. माळेगाव कारखान्याच्या बाहेर मराठा आंदोलक आक्रमक झाल्यामुळे अजित पवारांनी गळीत हंगामाच्या शुभारंभाला जाणे टाळले. याच पार्श्वभूमिवर आता मावळात देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष बाब म्हणजे मावळातील साखर कारखान्याच्या मोळी पूजनाला अजित पवार येणार का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
शुक्रवार दि.३ नोव्हेंबर रोजी मावळात कार्यक्रम
संत तुकाराम सहकारी साखर कासारसाई येथे आसवाणी ( ईथेनाॅल) प्रकल्पाचे भुमीपुजन व २६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवार दि.३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य भर आंदोलन चालू असून जरांगेपाटील यांचे उपोषन चालू आहे . त्यांची तब्येत देखील खालावली आहे. राज्यभर आंदोलक त्रीव झाले असून बीड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय पेटून दिले, गावो गावी खासदार, आमदार, मंत्री यांना येण्यास बंदी केली आहे. माळेगाव कारखानाच्या कार्यक्रमाला अजित पवार यांना विरोध केल्याने ते पूजनाला जावू शकले नाही, त्या पाठोपाठ दौंड येथील कारखान्याच्या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी यांनी विरोध केला आहे. त्यामुळे अजित पवार मावळात येणार का? की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे
मोळीपूजन, आंदोलन, आणि मराठा क्रांती मोर्चाची पुढाऱ्यांना गावबंदी
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर पुणे जिल्हा शेतकरी युनीयनच्यावतीने तसेच ऊस उत्पादक शेतक-यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले आहे. ऊसाला प्रति टन ३३०० रूपये भाव मिळण्यासाठी सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या नेतृत्वात शुकवार दि. ३ रोजी सकाळी १० वाजता मोर्चा नेण्यात येणार आहे. एकाच दिवशी मोळीपूजन, मोर्चा आणि पुढाऱ्यांना गावबंदी, राज्यात जाळपोळ सुरू झाली आहे, त्यामुळे अजित पवार येणार की कार्यक्रम टाळणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.