आम्ही अदानीला प्रश्न विचारले, मात्र चमचे का वाजू लागले? उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
नागपूर : धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरूद्ध ठाकरे गटाने काढलेल्या मोर्चावरून विरोधकांनी टीका केला आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेणाऱ्यांना सुनावले आहे. मी प्रश्न अदानीला विचारले, मात्र चमचे का वाजू लागले? असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही अदनींना प्रश्न विचारले, मात्र चमचे का वाजू लागले? धारावीच्या माध्यमातून आमच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे निर्णय घेणार असाल, तर ते आम्ही कसे सहन करू? या सरकारसारखा उघडा नागडा कारभार आधीच्या कुठल्याच सरकारने महाराष्ट्रात केलेला नाही. धारावीतील मोर्चाला आम्ही माणसं चंद्रावर आणली होती, पण मुद्दा मुंबईचा होता. माणसांवर बोलण्यापेक्षा मुद्द्यावर बोला.
हेही वाचा – संसदेच्या सुरक्षेवरून लोकसभेत आणि राज्यसभेत गोंधळ, विरोधी पक्षातील ३१ खासदार निलंबित
आमच्याकडे भाजपच्या मंत्र्यांबाबत पुरावे आहेत, मग एसआयटी का नाही? सलीम कुत्ता संदर्भात आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत विषय मांडताच एसआयटी लावली. पण, याच कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन नाचतानाचा पुरावा आमच्याकडे आहे. हे पुरावे सभागृहात दाखविल्यानंतरही सरकार आम्हाला बोलू देत नाही. आमच्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे एसआयटी लावण्यात यावी, असे ठाकरे म्हणाले. सरकारने मराठा आरक्षण कसे देता येईल, हे सांगावे. तसेच कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर सरकारच्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.