#WAR AGAINST CORONA: देशातील 274 जिल्ह्यांमध्ये कोरोना पसरला; हवेचा प्रसाराचा पुरावा नाही : ‘आयसीएमआर’ची माहिती
नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
कोरोनाचा कहर आजपर्यंत देशातील 274 जिल्ह्यांमध्ये झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की, भारतात आतापर्यंत एकूण 3374 कोविड- 19 प्रकरणे नोंदविली गेली आहेत.
देशभरात शनिवारी 472 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. कालपासून आतापर्यंत 11 मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत एकूण 79 मृत्यूची नोंद झाली आहे. 267 लोक बरे झाले आहेत. त्याचबरोबर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटले की कोरोना हवेतून पसरल्याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही.
गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव म्हणाले की, राज्य सरकार लॉकडाउन प्रभावीपणे राबवित आहेत. अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची स्थिती समाधानकारक आहे. ते म्हणाले की, भारतभरातील सर्व राज्यांमध्ये 27, 661 मदत शिबिरे आणि निवारा उभारण्यात आले आहेत – सरकारकडून 23, 924 आणि अशासकीय संस्थांकडून 3,737 याद्वारे 12.5 लाख लोकांना आश्रय मिळाला आहे.
19, 460 खाद्य शिबिरेही सुरू करण्यात आली आहेत. ते म्हणाले की 75 लाखाहून अधिक लोकांना अन्न पुरवले जात आहे. 13.6 लाख कामगारांना त्यांच्या मालकांनी आणि उद्योगामार्फत त्यांना निवारा आणि भोजन दिले जाते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.