‘भिडे गुरूजी सरकारचा सांगकाम्या’; काँग्रेस नेत्यांची खोटक टीका!
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जालन्यात येऊन आंदोलनस्थळी भेट घ्यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावी जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर ओबीसी समाजाचे अनेक तरूण आमरण उपोषणाला बसले आहेत, तिथेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जावं. त्यांचं उपोषण सोडवावं. असंही सरकारला काही काम उरलेलं नाही. त्यांना ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आणि उपोषण सोडवणं एवढचं काम उरलंय.
हेही वाचा – प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामांची मालमत्ता नोंदणी व हस्तांतरणाचा मार्ग मोकळा
काल गुरुजींनी त्यांना प्रमाणपत्र दिलं आहे, त्यांच्या शिष्यांना प्रमाणपत्र दिलं गेलंय. ते (मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री) तुमची फसवणूक करणार नाहीत असं गुरूजी मनोज जरांगे यांना म्हणाले. त्यांच्यावर विश्वास ठेवा असंही म्हणाले. आधी शिष्यांनी गुरुजींवर आणि मग लोकांनी शिष्यांवर विश्वास ठेवावा म्हणून गुरुजी त्यांची वकिली करायला गेले होते. त्यापलिकडे जाऊन गुरुजी हे अजित पवारांच्या काळजात घुसून आले. हे काळजीचे लोक आहेत असं प्रमाणपत्रही दिलं आहे. हा भिडे गुरूजी सरकारसाठी सांगकाम्याचं काम करतो का याचं लोकांना काल उत्तर मिळालं आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.