सत्तेविना गेली मती, मिळेल त्याच्याशी केली युती…मनसेची शिवसेनेवर खोचक टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Raju-Patil.jpg)
मुंबई। महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल(शुक्रवार) संभाजी ब्रिगेडसोबत युती केली. दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. तसेच राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. शिंदे गटासह भाजपच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. दरम्यान, सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली, असं म्हणत मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली, असं म्हणत राजू पाटलांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली.
शिल्लक सेनेने केलेली युती ही सर्वसामान्य शिवसैनिकासाठी वेदनादायक जातपातीचं राजकारण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसोबत शिल्लक सेनेने केलेली युती ही सर्वसामान्य शिवसैनिकासाठी अत्यंत वेदनादायक असल्याचं मत शिवसेनेतील शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केलं. संभाजी ब्रिगेड ही नक्की कुणाची बी टीम आहे हे माहीत असूनही ही युती करणं हे अनाकलनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही – नवनीत राणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केली. त्यावरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांच्यात दम असता तर ते असं घरात बसले नसते, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना पुन्हा उभारी घेण्यासाठी प्रयत्न करत असतानाच राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झालं आहे. राज्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात युती झाली आहे. त्यामुळे भाजपसह शिंदे गट आणि मनसेकडून त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे.