सुप्रिया सुळे त्या घटनांच्या वेळी का बोलल्या नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल
![Why didn't Supriya Sule speak at the time of those incidents ?; Question by Devendra Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Why-didnt-Supriya-Sule.jpg)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
नागपूरः कोणत्याही पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पुरुषाचे हात कलम करण्याचा इशारा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यापूर्वीच्या घटनांच्या वेळी का बोलल्या नाही, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या कार्यक्रमातील राड्यानंतर महिला कार्यकर्त्यावर पुरुषाने हात उगारल्याच्या आरोपावरून राज्यात नवा वाद सुरू झाला. यासंदर्भात नागपुरात आगमनानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सुळे यांना सवाल केले. सुप्रिया सुळे यांनी सर्वच बाबतीत असा निर्णय घेतला पाहिजे. खासदार नवनीत राणांबाबत झाले असता त्या बोलल्या नाही. अनेक लोकांवर, महिलांवर हल्ले झाले, तेव्हा बोलल्या नाही. आमच्याही महिला नेत्यांना पोलिसांनी वाईट वागणून दिली तेव्हाही त्यांचे मौन होते. त्यांनी ही भूमिका वारंवार घ्यावी आम्ही स्वागत करू, असे फडणवीस म्हणाले.
पोलिस संरक्षणात भाजप नेत्यांवर हल्ले करणे, आमच्या नेत्यांच्या सभांमध्ये आंदोलन करणे, नेत्यांवर अंडी, टोमॅटो फेकण्याचा प्रयत्न हे सर्व आपले राज्य व गृहमंत्री असल्याच्या तोऱ्यात होत आहे. आम्ही लोकशाहीला मानणारे आहोत, त्यामुळे आधी तक्रार करू. कारवाई झाली नाही तर आम्ही देखील सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
राज्यसभेसाठी छत्रपती संभाजी राजे यांना शिवसेनेच्या समर्थनाबाबत विचारले असता, शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे. त्यांचा निर्णय ते घेतील. छत्रपती संभाजी राजे सक्षम आहेत. त्यामुळे यासंदर्भात मी बोलण्याचे कारण नाही, असे फडणवीस यांनी म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निर्णय राज्य आयोगाकडे आहे. साधारण: ७ जूनपासून मान्सूननंतर सर्वत्र पाऊस सुरू होते. त्यापूर्वी आयोगाचे काम संपल्यास निवडणुका घेतील, अन्यथा घेऊ शकणार नाही. तथापि, आयोगाची अधिकृत भूमिका जाहीर होत नाही तोपर्यंत याबाबत अंदाज लावणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.