वैनगंगा कोपली! एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा आला पूर, जनजीवन विस्कळीत
![Maharashtra Flood 2022 : वैनगंगा कोपली; एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा आला पूर, जनजीवन विस्कळीत](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Maharashtra-Flood-2022-वैनगंगा-कोपली-एकाच-आठवड्यात-सलग-दुसऱ्यांदा.jpg)
चंद्रपूर । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
गत दोन दिवसांपूर्वी आलेला संततधार पाऊस आणि गोसेखुर्द धरणातीत पाण्याचा विर्सग यामुळे ब्रह्मपुरीत तालुक्यात एक आठवड्यात दुसऱ्यांदा पूरपरिस्थिती निर्माण झाली. अनेक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. ब्रह्मपुरी आरमोरी मुख्यमार्गासह तालुक्यातील काही गावांतील रस्ते बंद झाले आहे. त्यामुळे पुन्हा जनजीवन प्रभावित झाले आहे.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. ब्रह्मपुरीत तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील पिंपळगाव, खरकाडा, अहेरनवरगाव, रणमोचन, बेलगाव या गावांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे या गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. १० आणि ११ आगस्टला ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.
आता एका आठवड्यात दुसऱ्यांदा पूर आला आहे. किन्ही येथील विद्युत उपकेंद्र पाण्याखाली गेले आहेत. पुराचे पाणी वाढल्यास या उपकेंद्राला जोडलेली गावं अंधारात जाण्याची शक्यता आहे. बेटाळा फाट्यावरील महाराष्ट्र इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालय पाण्याखाली आले आहे. या महाविद्यालयाच्या मागे असलेल्या शीतपेयाच्या कारखान्यातसुद्धा पाणी घुसले.
ब्रह्मपुरी ते आरमोरी या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे . ब्रह्मपुरी ते गांगलवाडी आरमोरी मार्ग बंद झाला आहे. लाडज, बेलगाव, बोळधा, कुडेसावली, हळदा, बरडकिन्ही, चिचगाव, बेटाळा, मालडोंगरी, नीलज, रूई, पाचगाव, खरकाडा, रणमोचन, किन्ही या गावांना पुराची झळ पोहोचली आहे. ब्रह्मपुरीत तालुक्यातील नदीकाठालगत असलेल्या शेतांमध्ये पाणी घुसले असून यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.