पुढचा मुख्यमंत्री प्रहारचा, हम बोलेंगे वैसेही सरकार चलेगी : बच्चू कडू
![The next Chief Minister Praharcha, we will say the government will run anyway: Bachchu Kadu](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Bachchu-Kadu.jpg)
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांच्या वाढलेल्या वजनावरुन अपक्ष आमदार मंत्री बच्चू कडू यांनी जोरदार टोलेबाजी केली. “येणारा काळ हा अपक्ष आमदारांचा असणार आहे. हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा, असं बच्चू कडू म्हणाले. अपक्षांचा झटका काय असतो आणि परिणाम कसे असतील ते विधान परिषद निवडणुकीत दिसणार आहे, असंही सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं.
राज्यसभेच्या चुरशीच्या लढाईनंतर आज विधान परिषदेच्या १० जागांसाठी भाजप-महाविकास आघाडीत पुन्हा संघर्ष होतो आहे. सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी १ वाजताच्या दरम्यान बच्चू कडू यांनी मतदान केलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचं महत्त्व त्यांनी आज पुन्हा एकदा अधोरेखित केलं.
बच्चू कडू म्हणाले, “येणारा काळ हा छोट्या पक्षाच्या आमदारांचा आणि अपक्ष आमदारांचा असणार आहे. कारण निवडणुकीत दिवसेंदिवस त्यांचं वजन वाढत आहे. त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल. महाविकास आघाडीच्या बाजूला राहून दुसऱ्या पक्षाला फटका बसेल”, असं म्हणत त्यांनी भाजप उमेदवाराच्या पराभवाचे संकेत दिले.
येणारा मुख्यमंत्री प्रहारचा असेल
“अपक्ष आमदारांचं वाढलेलं वजन अधोरेकित करुन झाल्यावरही पत्रकारांच्या प्रश्नांची यादी संपत नव्हती. शेवटी जाता जाता पुढच्यावेळी आमचंच राज्य येणार आहे, पुढचा मुख्यमंत्री प्रहारचा होईल, असं बच्चू कडू हसत हसत म्हणाले.
महाविकास आघाडीचं जोरदार प्लॅनिंग
आवश्यक संख्याबळ नसतानाही विविध डावपेच आणि राज्यसभा निकालाने दिलेल्या कॉन्फिडन्सच्या बळावर फडणवीसांनी पाचवा उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर इकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल रात्री उशिरापर्यंत बैठका घेऊन आमदारांमध्ये जान भरली. शिवसेना सोडता सर्वच पक्षांना अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागत आहे.
मतदान सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल झाले. त्यांनी अनिल परब आणि अनिल देसाई यांच्याकडून सकाळच्या घडामोडींची माहिती घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांना मार्गदर्शन केलं. मतदान करताना ५ आमदारांच्या गटाने मतदान करावं. मतदान करताना कुणीही गडबड करु नये. ज्या प्रमाणे मतदानाच्या सूचना दिल्यात, त्याची अंमलबजावणी करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आमदारांना दिल्या.