मोदींच्या अग्निवीरांची दैना, ना निवारा ना खायला अन्न, भावी अग्निवीरांनी कालची रात्र रस्त्यावर…
औरंगाबाद: राज्यातील पहिली अग्निवीर भरतीला औरंगाबादेत शनिवार पासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे हजारो तरुण औरंगाबदेत दाखल झाले आहेत. मात्र, या तरुणांना राहण्याची खाण्याची सोय नसल्याने भावी अग्निवीरांनी कालची रात्र रस्त्यावर, मंदिरात उपाशी राहून काढावी लागली.
राज्यातील पहिली अग्निवीर भरती प्रकिया शनिवारपासून औरंगाबाद येथून सुरु झाली आहे. अग्निवीर होण्याच्या अपेक्षा घेऊन शनिवारपासून औरंगाबादमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील तब्बल ७६ हजार तरुणांनी यासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. भरतीसाठी आलेल्या तरुणांसाठी राहण्याची कोणतीही सोय नसल्याने त्यांना रस्त्यावर, मंदिरांच्या समोर झोपण्याची वेळ आली आहे. तर पिण्यासाठी पाणी सुद्धा मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.
औरंगाबादेत हजारो तरुणांचा घोळका रस्त्यावर
मंगळवारी रात्री अचानक हजारो तरुणांचा घोळका डॉ. बाबासाहब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला लागून असलेल्या ढिंबरगल्ली, विद्युत कॉलोनी, पहाडसिंगपुरा, जयसिंगपुरा परिसरात दिसून आला. हे तरुण रात्री निवारा मिळतो का, कॉट बेसिसवर रूम मिळते का, हे पाहण्यासाठी फिरत होते.
तरुणांचा घोळका पाहून नागरीक चिंतेत
मात्र, एवढ्या मोठ्या तरुणांचा घोळका पाहून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, नंतर हे तरुण भरतीसाठी आलेले आहेत, त्यांना राहण्यासाठी जागेचा शोध घेत असल्याचे समोर आल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं. मात्र, तरुणांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी उपाशी रहुन रात्र काढली.