सुरजागड प्रकल्पामुळेच नक्षलवाद्यांचा बिमोडः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![Surjagad project is the only reason why Naxalites are upset: Chief Minister Eknath Shinde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/eknath-Shinde-1.jpg)
नागपूरः गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असताना मी सुरजागड प्रकल्पाची पार्श्वभूमी जाणून घेतली. त्यावेळी नक्षलवादी काम करू देणार नाहीत, अशी बाब समोर आली. मी पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले. सरकारपुढे नक्षलवाद्यांची हिंमत होणार नाही आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करून मी प्रकल्प सुरू केला. आता या प्रकल्पामुळे या भागातील नक्षलवाद कमी झाला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेत म्हणाले.
महिलांसाठी विविध प्रशिक्षण सुरू करून रस्ते, आरोग्य सुविधा निर्माण केल्या. या प्रकल्पामुळे वर्षभरात सुमारे ४५० कोटींचा महसूल मिळाला. आता मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असल्यानंतर आम्ही जातीने या प्रकल्पात लक्ष घालू आणि हा प्रकल्प कसा वाढेल या दृष्टीने प्रयत्न करू, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मराठी माणसाची आहे. मुंबई ही कुणाच्या बापाची नाही तर महाराष्ट्राची आहे. अशा प्रकारचं भाष्य करणं किंवा चिथावणीखोर वक्तव्य करणं हे कुणालाही न परवडणारं आहे. मुंबईवर जेव्हा आपत्ती आली तेव्हा मुंबईकर एकजुटीने मुंबईला वाचवण्यासाठी पुढे आलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी या मुंबईचं रक्षण केलं आहे. मी या वृत्तीचा निषेध केला आहे आणि निंदाही करतो, असं शिंदे म्हणाले.
महाराष्ट्रात कानडी लोकंही राहतात. मुंबई ही अशीच मिळाली नाही. त्याला त्याग आणि बलिदान द्यावं लागलं आहे. आज सर्वच जण बेळगावमधील मराठी माणसांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. एकजूट दाखवल्यामुळे त्यांना आधार मिळणार आहे. मागील ६६ वर्षांपासून सीमाबांधवांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर संघर्ष करावा लागतोय. ही ८६५ गावं आपल्या हक्काची आहेत. कर्नाटकात ज्या बाबी घडलेल्या आहेत. त्या आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहोत. त्यामुळे युद्धात आणि न्यायालयातही जिंकू, असंही शिंदे म्हणाले.