शेतीच काम करत असताना जिल्ह्यात आज धक्कादायक; धावपळ करूनही वेळेत उपचार मिळालाच नाही आणि…
गुहागर : कोकणात सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू आहे. शेतीच काम करत असताना जिल्ह्यात आज धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतात वाढलेले गवत काढण्याचे काम करत असताना दबा धरुन बसलेल्या विषारी सापावर महिलेचा पाय पडल्याने तिला साप चावला. यावेळी आजूबाजूला कोणी नव्हते. तसेच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वेळ झाल्याने ५९ वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुहागर तालुक्यात मुंढर गावात घडली आहे. प्रभावती प्रकाश मोहित वय ५९ असे या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी घडली आहे. गुहागर पोलिसांनी तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात या घटनेचा पंचनामा केला.
तालुक्यातील मुंढर वळवणवाडी येथील शेतकरी महिला प्रभावती प्रकाश मोहित (वय-५९, राहणार मुंढर वळणवाडी) या आपल्या घराशेजारी असणाऱ्या शेतात गवत काढत होत्या. याचवेळी गवतात बसलेल्या सापावर त्यांचा अनावधानाने पाय पडला आणि घात झाला. सापाने पायाला दंश करताच या महिलेने आरडाओरडा केला. पण कोणीच नसल्याने हा साप सापडला नाही.
ही महिला तत्काळ घरी आली व तिने शेजाऱ्यांना या धक्कादायक प्रकाराची माहितीही दिली. शेजाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ सुरू केली. पण त्यांना वेळेत कोणतेही वाहन मिळाले नाही. यामध्ये वेळ गेला, थोड्या वेळाने वाहन मिळताच ग्रामस्थांनी वाहनातून तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेत होते पण वैद्यकीय उपचार मिळण्यापूर्वीच या महिलेचा वाहनामध्येच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तळवली वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी तपासून या महिलेचा वाहनातच मृत्यू झाल्याचे सांगितले.
या महिलेल्या कोणत्या विषारी जातीच्या सापाने दंश केला हे समजू शकलेले नसले तरी या महिलेला कांडर जातीचा साप चावला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रभावती मोहिते या मुंढर येथे गावात राहतात. मुले कामानिमित्त शहरात राहतात. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व दोन मुली असा परिवार आहे. या सगळ्या दुर्दैवी धक्कादायक प्रकाराने मुंढर वळवणवाडी परिसरात दुःखद वातावरण आहे.





