हिंगोलीत पुन्हा पावसाचा हाहाकार: पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी रडकुंडीला
![Rains again in Hingoli: Farmers panic as crops go under water](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Rains-again-in.jpg)
हिंगोली : जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. हिंगोली शहरासह ग्रामीण भागातही सर्वदूर पाऊस झाला. शहरापासून वाहणाऱ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं पाहायला मिळालं. सेनगाव तालुक्यातील वटकळी, साखरा, आजेगाव, हिवरखेडा, खडकी, बंनबरडा, जयपूर यासह अन्य गावांमध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस कोसळला.
मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, हळद ही सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. यंदा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर वरुणराजाने अवकृपा दाखवली आहे. पेरणी झाल्यापासून म्हणजे साधारण एक महिन्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यानंतर आता दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे कोवळ्या पिकांना फटका बसला असून उत्पादनावर याचा परिणाम होणार असल्याचं शेतकरी वर्गातून बोललं जात आहे.
ईडोळी गावासह अन्य गावातील नदीकाठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्याने शेती व पिकाचे प्रचंड नुकसान झालं आहे. उभ्या पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत, तर काही ठिकाणी शेतजमीन खरडून गेली आहे.
पुलाखाली अडकले ट्रॅक्टर
हिंगोली तालुक्यातील साटंबा येथील रेल्वे पुलाखाली साचलेल्या पाण्यात अडकलेले ट्रॅक्टर जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. पुलाखालील पाणी काढून देण्याबाबत वारंवार निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाणी निचरा होत नसल्याने साटंबा येथे रेल्वेचा पूल उभारण्यात आला आहे. पुलाखालूनच वाहतूक होत आहे. मात्र पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावली नसल्याने पाणी साचून राहते. काल दुपारपासून सुरू असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यात ठिकठिकाणी ओढ्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटल्याचं दिसून आले.