पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात राडा; भाजपच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
![Radha at Balgandharva Rangmandir in Pune; BJP workers charged with molestation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Radha-at-Balgandharva-Rangmandir-in-Pune-BJP-workers-charged-with-molestation.jpg)
पुणे | पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळ प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेक्कन पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमात सोमवारी मोठा गोंधळ झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. यावेली भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.
बालगंधर्व रंगमंदिरातील गोंधळाप्रकरणी व्हायरल झालेले व्हिडिओ पाहून पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भस्मराज तिकोणे, प्रमोद कोंढरे आणि मयूर गांधी या भाजपच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय घडलं पुण्यात?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या ताफ्यावर पुण्यात काल राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी अंडी फेकली. यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात स्मृती इराणींचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात महागाईच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. बालगंधर्व रंगमंदिरात भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.