जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटने नवा वाद… आंतरजातीय विवाहाची समिती चातुवर्ण व्यवस्था मजबूत करणारी
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
आंतरजातीय विवाहांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीवर माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टिका केली आहे. ही समिती म्हणजे जाती व्यवस्था म्हणजेच चातुवर्ण व्यवस्था मजबूत करण्याचे काम सुरु आहे, असा आरोप आव्हाड यांनी बुधवारी केला.
मंगळवारी राज्य शासनाने ही समिती स्थापन केली. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन समितीवर टीका केली. ते म्हणाले, आंतरजातीय/धर्मीय विवाहांची मोजदाद करण्याचा सरकारला काय अधिकार आहे? पुरोगामी महाराष्ट्राला २०० वर्षे मागे न्यायचंय काय? कुणाशी विवाह करायचा ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे. सरकारने हे पाऊल तातडीने मागे घ्यावं, अशी मागणी आव्हाड यांनी ट्विटमध्ये केली आहे. आव्हाड यांच्या ट्विटला अजून शिंदे- फडणवीस सरकारने उत्तर दिलेले नाही. मात्र ही समिती म्हणजे चातुवर्ण व्यवस्था मजबूत करण्याचे काम सुरु आहे, या आव्हाड यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.