मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नारायण राणेंची टीका, म्हणाले… आयत्या बिळावर नागोबा!
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. “उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे? ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस… आयत्या बिळावरचा नागोबा”, अशा शब्दात नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत भाजप आणि राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. भाजपच्या हिंदु्त्वाचा जोरदार समाचार घेत आम्हाला हिंदुत्व शिकवू नका. आमचं हिंदुत्व गदाधारी आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. तर राज ठाकरेंनी आधी मराठी आणि आता हिंदुत्वाच्या नावाने राजकारण केलं. त्यांचे माकडचाळे लोकांना न समजायला देशातील जनता मूर्ख नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज यांना सुनावलं. राणेंना मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी कमावलं ते उद्धव ठाकरेंनी गमावलं. उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व काय आहे? उद्धव ठाकरे म्हणजे कर्तृत्वशून्य माणूस.. ते पवारांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्रीपदावर बसले. आयत्या बिळावरचा नागोबा. राज ठाकरेंना भोंगा म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:चा भोंगा वाजवत आहेत. त्या माणसावर बोलण्यासारखं फार काही नाही”, अशी जोरदार टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
“महाराष्ट्रदिनी राज्यातील जनतेला काय देणार ते बोलावं. गरिबी, निरक्षरता, रोजगार, दरडोई उत्पन्न यानर न बोलता उगीचच फुकटची बडबड. उद्धव ठाकरेंना राजकारण जमत नाही. मुख्यमंत्रीपदावर ते शोभत नाही. त्यांनी महाराष्ट्र १० वर्षे पाठीमागे नेला”, अशा शेलक्या शब्दात राणेंनी मुख्यंमंत्र्यांना लक्ष्य केलं.