पावसात बीडचे रस्ते बनले मृत्यूचा सापळा
![In the rain, the roads of Beed became a death trap](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/In-the-rain-the-roads-of-Beed-became-a-death-trap.jpg)
आमदारांनी लक्ष घालावं, नागरिकांची मागणी
बीड: बीड शहरातील बार्शी नाका भाग ते जालना रोड पर्यंत सिमेंट रस्ता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी करण्याचं ठरवलं होतं. मात्र, स्वराज्य नगर पासून जालना रोड पर्यंत सिमेंट रस्ता करण्यात आला. या रस्त्याच्या कामात विरोधकांनी अनेक चुका काढल्या. मात्र, बीडच्या आमदारांनी हा रस्ता बनवला.रस्ता तसा चांगला झाला मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजुला मुरूम टाकल्याने त्यामुळे चिखल हा रस्त्यावर आला आहे. रस्त्याला जिथून सुरुवात होतो त्या सुरुवातीलाच इतकी भयाण अवस्था आहे की नागरिकांना गाडी कशी चालवावी हेच कळेनासं झालं आहे. विरोधकांनी काढलेल्या चुका कडे लक्ष न देता रस्ता बनवला मग हा मृत्यूचा सापळा आहे की काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
गेल्या चार दिवसांपासून बीड शहरामध्ये पाऊस चालू आहे. पावसामध्ये बीडच्या विकासकामातील त्रुटी जनतेला दिसू लागल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मार्गापासून नगर नाका भागापर्यंत मोठमोठे खड्डे पडले आहेत.
दुसरीकडे स्वराज्य नगर बार्शी नाका या परिसरात तर खड्ड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या खड्ड्यांबद्दल आवाज उठवला की त्या ठिकाणी मुरूम टाकला जातो मात्र मुरूम पावसाच्या पाण्यात वाहून जातो. या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. स्वराज्य नगर भागातून बीड शहरात येणारा मुख्य रस्ता असून या ठिकाणी चार दिवसात अनेक अपघात झाले आहेत. मात्र, त्या अपघातांचं स्वरुप किरकोळ असल्यानं कोणीही गंभीर जखमी झालं नाही. मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळं अपघात झाल्यास जीवितहानी होऊ शकते, अशी शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे.
बीड शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे नवख्या वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज नसल्यानं अपघाताची शक्यता निर्माण झाला आहे. बीडमधील काही नागरिकांनी खड्ड्यांमुळे आपण व्यवस्थित घरी जाऊ शकतो का असा प्रश्न उपस्थित केला आहे. काही नागरिकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर चार दिवसात खड्डे बुजवण्याची कसलीही यंत्रणा कामाला लागलेली नाही. रस्त्याचं अर्धवट काम झाल्यानं शहरातील कोणता विकास केला हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.