मुंबईत जोरदार पाऊस, कोकणात जगबुडी, सावित्री नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : महाराष्ट्रात मुंबई, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूरसह विविध ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत दुपारनंतर पावसाला सुरुवात झालीय. रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडीनं नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, रायगड जिल्ह्यात सावित्री नदी देखील इशारा पातळीवरुन वाहत आहे. तर, कोल्हापूर जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईत दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई, दादर, घाटकोपर, नवी मुंबई आणि ठाण्यात जोरदार पाऊस झाला आहे. मुंबईच्या लोकल सेवेवर देखील परिणाम झाला आहे. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय. सीएसएमटी-ठाणे सेक्शन मध्ये खूप पाऊस पडत आहे. मेनलाइन वर काही ट्रेन्स 10-15 मी. व हार्बरवर काही ट्रेन्स 10 मी. विलंबाने धावत आहेत.मात्र, ट्रेन्स कुठेही थांबलेल्या नाहीत.ट्रान्स हार्बर व नेरूळ/बेलापूर खारकोपर मार्गावर ट्रेन्स सुरळीत सुरु आहेत.
जगबुडीनं धोक्याची पातळी तर सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली
रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर नगर परिषदेतर्फे याची नागरिकांना कल्पना देण्यासाठी भोंगा वाजविण्यात आला. त्नागिरी जिल्हयात सोमवारी मोठ्या पावसामुळे मंडणगड येथेही पावसाने जोर धरला आहे, भिंगळोली समर्थ कृपा अपार्टमेंट समर्थ नगर येथे पाणी आले होते या सगळ्या परिस्थितीवर मंडणगड तालुका प्राशसन लक्ष ठेऊन आहे.
रायगड जिल्ह्यात सावित्री नदी इशारा पातळीवरून वाहत ६:३०मीटर पातळीवर वाहत ६:५०ही धोकादायक पातळी आहे.महाड शहरातील एकुण चाळीस नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.या सगळ्यामूळे महाड शहरात यावर्षी पुन्हा पाणी भरण्याची शक्यता निर्माण झाली असून महाड प्रशासन यावर लक्ष ठेऊन असुन सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे
कोल्हापुरात आज दिवसभर पावसाची जोरदार हजेरी
पंचगंगा नदीवरील राजाराम बंधा-यासह दोन बंधारे पाण्याखाली. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी १५ फुटांवर पोहोचली. कोल्हापुरात सोमवारी दिवसभर पावसाची संततधार कायम राहिली. दिवसभर पावसाचा जोर होता. धरणक्षेत्रातही जोरदार पाउस होत असल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित झाले आहेत.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूर जवळील कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे या बंधाऱ्यावरुन होणारी वाहतूक रोखली आहे. शिंगणापूर बंधाराही पाण्याखाली गेला आहे. याशिवाय रुई, इचलकरंजी व सागळी बंधारे पाण्याखाली आहेत. सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप होती. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. संध्याकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला.