आधी राजू शेट्टींना खेटून उभे राहिले, मग हळूच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काढता पाय घेतला
![First Raju Shetty stood up, then Congress and NCP leaders stepped aside](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/आधी-राजू-शेट्टींना-खेटून-उभे-राहिले-मग-हळूच-काँग्रेस-व.jpg)
सांगली : एका बाजूला काँग्रेसचे (Congress) माजी मंत्री दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते आणि मध्ये राजू शेट्टी… (Raju shetti) प्रसारमाध्यमांना मुलाखत देण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आजूबाजूला ही परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र राजकीय प्रश्नाला सुरुवात झाली आणि राजू शेट्टी यांना आपण सगळयाच पक्षांपासून चार हात लांब असल्याचे सांगितले. हे ऐकताच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेट्टी यांच्यापासून हळूच काढता पाय घेतला. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे हे चित्र पाहायला मिळाले. (Raju Shetty has said that he is 4 hands away from all political parties)
एका बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने माजी खासदार राजू शेट्टी, कॉंग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, तासगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे एकत्र आले होते. या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी राजू शेट्टी यांच्या मुलाखतीसाठी पुढे सरसावले. तिथे उपस्थित असणारे काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील राजू शेट्टी यांच्या उजव्या बाजूला थांबले. तर, त्यांच्या डाव्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील थांबले बैलगाडी शर्यतीवर प्रतिक्रिया दिली.
सुरेश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर शेट्टी यांना राज्यसभेबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सगळया पक्षांपासून चार हात लांब आहे, असे सांगितले. शेट्टी यांची ही प्रतिक्रिया ऐकून आजूबाजूला असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या. यानंतर शेट्टी यांना विधान परिषद निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला.
राजू शेट्टी यांचे रोखठोक विधान लक्षात घेऊन, शेट्टी यांच्या उजव्या बाजूला असणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी मिश्किलपणे हसत बाजूला होणे पसंत केले आणि त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील नेते येथे जितेश कदम यांना उभे केले. तर, पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील यांनीही राजू शेट्टींनी राज्य सरकारवर टीका करताच काढता पाय घेतला.