Chala Hawa Yeu Dya; पोस्टाने केला पोस्टमनचा असाही गौरव…
![arvindarvind jagtap post ticket by pune rural post office honor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/arvindarvind-jagtap-post-ticket-by-pune-rural-post-office-honor.jpg)
छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, श्रेया बुगडे आदी सर्वच कलाकारांनी आपआपल्या कामातून रसिकांचं मनोरंजन केलं.
याच कार्यक्रमात एक अत्यंत संवेदनशील पात्र आहे. ते म्हणजे पोस्टमन दादा. सागर कारंडे पोस्टमनच्या वेषात येऊन अत्यंत महत्वाच्या विषयावरची पत्र वाचत असतो. या पत्रातून सामान्य माणसाच्या ह्रदयाला हेलावून टाकणारा मजकूर लिहिण्यात आलेला असतो. ही पत्रं जरी कलाकार वाचत असले तरी ते शब्दबद्ध केले जातात ते अरविंद जगताप यांच्या लेखणीतून. त्यांच्या पत्रांची त्यांच्या लिखाणाची हीच दखल घेऊन पुणे ग्रामीण पोस्ट विभागातर्फे अरविंद जगताप यांचा सत्कार करण्यात आला. केवळ सत्कार करून पोस्ट विभाग थांबलं नाही. तर अरविंद यांचं पोस्टाचं तिकीटही काढण्यात आलं. आणि त्यांना त्याची सुरेख भेटही देण्यात आली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/arvind-jagtap-post-ticket-by-pune-rural-post-office.jpg)
वाचाः रणबीर- आलियाचा साखरपुडा ‘पिंक सिटीत’?
अरविंद जगताप यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. त्यांचं सर्वंच स्तरातून कौतुक होतं आहे. चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम आहेच. पण त्याचवेळी मराठी कलाकार हा संवेदनशीलही असतो त्याचं प्रदर्शन या कार्यक्रमातून वारंवार घडलं ते जगताप यांच्या लेखणीमुळे. कधी नदीवर. कधी शेतीवर.. कधी सामान्य माणसावर.. कधी कष्टकऱ्यांवर.. तर कधी मुंबईवर अशा विविध विषयांवर अरविंद यांनी पत्रं लिहिली आणि ती या कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहचली. त्यांच्या या कार्याचा गौरव पोस्टाने करणे हे ही तेवढेच कौतुकास्पद आहे.