मराठवाड्यासाठी मोठी बातमी,जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली
परभणी : राज्यात जुलै महिन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रात पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर आता मराठवाडा आणि विदर्भात देखील जोर लावला आहे. मराठवाड्यासाठी महत्त्वाचं असलेल्या जायकवाडी धरणातील पाण्यासाठ्यात देखील वेगानं वाढ होतं आहे. मराठवाड्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी येथील नाथसागराच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत आहे. तर सध्या स्थितीला धरणामध्ये ७३.९७ टक्के पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रामधून येणाऱ्या पाण्याची आवक पाहता केव्हाही धरणाचे दरवाजे उघडून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो. जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी गोदावरी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. परिणामी परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पातळी मध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.
त्यामुळे परभणीसह मराठवाड्यातील जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीकाठच्या गावांना जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन ही जायकवाडी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.दरम्यान, जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्यास परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील अनेक गावे गोदावरी काठावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.2006 ला आलेल्या महापुरामुळे या भागात खूप मोठे नुकसान झाले होते.आता जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढत असल्याने केव्हाही पाणी सुटेल परंतु असे असले तरी जायकवाडी पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन करावे अशी मागणी शाहागड, गोंदी परिसरातील नागरिक करत आहेत.





