राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या देवतांच्या पंचधातूंच्या प्राचीन मूर्ती चोरीला जाऊन ४८ तास उलटले; चोरीची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी जाहीर केलं बक्षीस
जालनाः जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीला गेल्या आहेत. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या देवतांच्या पंचधातूंच्या प्राचीन मूर्ती चोरीला जाऊन ४८ तास उलटले आहेत. या मूर्ती ४५० वर्षांपूर्वीच्या आहेत. मात्र, अजूनही या मूर्ती न सापडल्याने ग्रामस्थांनी अन्नत्याग तप आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनाही मंदिरातील मूर्ती चोरीची माहिती देणाऱ्याला बक्षीसाची घोषणा केली आहे. भगवान श्री रामाच्या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत पोलिसांनी भावनिक अवाहन केलं आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील प्रसिध्द अशा जांब समर्थ गावातील प्राचीन मूर्ती चोरी होऊन तीन दिवस उलटले तरी अजूनही मुर्त्यांचा शोध लागला नाहीये. या मूर्ती चोरी झाल्याने राज्यासह, परदेशातील भक्तांनी संताप व्यक्त करीत या मूर्तींचा शोध घेण्याची मागणी केली आहे. विधानसभेत देखील या चोरीची चर्चा झाल्याने पोलिस प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सात पथके यासाठी तैनात करण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही चोरट्यांचा थांगपत्ता न लागल्याने भक्तांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
चोरांचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांनी मोठे वेगळं पाऊल उचललं आहे. चोरट्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे नागरिकांना चोरीची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी दिलं आहे. चोरीची माहिती देणाऱ्याला २५,०००/- रुपयांचे रोख बक्षीस देखील जाहीर केले आहे. श्री रामाच्या गाण्यातील हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे.
मूर्तीचोरांना तातडीने शोधा
समर्थ रामदास स्वामींच्या पूर्वजांच्या देवघरातील श्रीराम मंदिरातून चोरीला गेलेल्या मूर्ती शोधून चोरट्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी जांब समर्थमधील ग्रामस्थांचं एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. बुधवारी सकाळी नऊपासून ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. ‘ज्या दिवशी मूर्ती मिळेल तो दिवस आमच्यासाठी दिवाळी दसरा असेल,’ असे समर्थ रामदासांचे ११ वे वंशज भूषण स्वामी यांनी या वेळी म्हटले आहे. या आंदोलनात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग महाराज आनंदे अन्नत्याग तप आंदोलनात सहभागी झाले आहेत. भूषण स्वामी यांच्यासह स्थानिक गावकरी विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मंडळी, महिला, आबालवृद्ध एकत्र येऊन हरिनाम संर्कीतन करीत आहेत.