बांधकाम कामगारांचा मुंबईतील कामगार भवनावर मोर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/IMG_20181222_170353.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील कामगार भवनाच्या आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सरकार विरोधात घोषणा देवून राज्यातील कामगार सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित मोर्चात कॉ.शंकर पुजारी, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, कोल्हापुरचे आनंदा गुरव, पालघरचे कॉ. कपिल पाटिल, औरंगाबादचे मधुकर खिलारे, नाशिकचे सिताराम ठोंबरे, पुण्याचे श्रीमंत घोडके, सखाराम केदार, उमेश डोर्ले आदीसह विविध जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे प्रलंबित अर्ज निकाली काढून कामगाराना सर्व लाभ दया, बांधकाम कामगारांना घरासाठी अनेक वेळा अनुदान व बिनव्याजी कर्ज देण्याच्या घोषणा अनेक वेळा करण्यात आल्या. मात्र, अजूनही कामगारांना काहीही मिळाले नाही. सरकारची केवळ घोषणा सुरु सून प्रत्यक्षात लाभ देण्याची मागणी केली.
काशिनाथ नखाते म्हणाले की, कामगारांच्या अपघाती मृत्यूकड़े त्यांनी लक्ष वेधले. कामगाराना सुरक्षा साधनांची सक्ती असताना बांधकाम विकासक आणि मोठ- मोठे ठेकेदार कामगाराना सुरक्षा साधनाची पुर्तता करीत नाहीत. त्यांच्यावर अधिकचा बोजा टाकुन केवळ कामे करुन घेत आहेत. सुरक्षेबाबत अंमलबजावणी न करणाऱ्या विकसक आणि कंत्राटदारावर करवाई करावी, तसेच त्या कामाना परवानगी देऊ नये, असे नमूद करत अपघाती व नैसर्गिक मृत्यु झालेल्या कामगारांना तातडीने लाभ देण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली.
यावेळी कामगार विभागाचे सचिव श्रीरंगम यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. त्यांनी मागण्यांवर सकारात्मक विचार करुन पुढील बैठकीत विषय घेवू,असे आश्वासन दिले.