नाचता येईना अंगण वाकडं अशी त्यांची गत झालेली आहे; औरंगाबाद संभाजीनगर नामकरण वाद पेटला
![Pravin Darekar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Pravin-Darekar-new.jpg)
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यावरून राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. नामकरणाचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे बंद केलं पाहिजे, अशी टीका केली आहे.
तसेच, कुठल्याही शहराचं नामकरण करण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव, राज्य सरकारची मंजुरी आणि मग केंद्राची मान्यता अशी प्रक्रिया आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करायच असेल, तर महापालिका तुमची आहे तिथे ठराव करा, राज्याच्या कॅबिनेटला निर्णय द्या. असं देखील दरेकर यांनी सांगितलं आहे.
याचबाबतीत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना प्रवीण दरेकर यांनी, “यांचा (राज्य सरकारचा) एकही विषय, एकही दिवस, एकही सेकंद केंद्राशिवाय जात नाही. कुठलीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट दाखवयचं, मग तुम्ही कशाला राज्य सरकार चालवता? महाकाली लेणी संदर्भात निर्णय घेताना तुम्ही केंद्राला विचारलं होतं का? आमच्या अस्मितेसंदर्भात कुठलाही विषय केंद्राकडे अडकणार नाही. आम्ही त्याच्या पाठीशी असू. परंतू, नाचता येईना अंगण वाकडं अशी त्यांची गत झालेली आहे”, असे म्हटले आहे.