देशात भ्रष्टाचार वाढवण्यात काॅंग्रेसचा हात – नरेंद्र मोदी
नांदेड – दहशतवादच नाही, तर देशात भ्रष्टाचार वाढवण्यातही काँग्रेसचा हात आहे. देशाच्या सुरक्षेसंबंधीत दलाली खाणंही काँग्रेसला आवडतं. जेवढा मोठा व्यवहार, तेवढी मोठी मलाई अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.
भाजपचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, 2014 ला मी पाडव्याच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात आलो होतो, आज पाडव्याच्या दिवशी आलो, असं म्हणत मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि ओमर अब्दुला यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेसला जम्मू काश्मीर आणि देशात 2 पंतप्रधान पाहिजेत, अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसची अवस्था बुडत्या जहाजासारखी झालीय, जे या जहाजात बसतील, ते राष्ट्रवादीसारखे बुडतील, असं म्हणत मोदी यांनी काँग्रेससह राष्ट्रवादीला टोला लगावला.
मोदी यांच्या भाषणातील मुद्दे –
-फारुख अब्दुल्ला जाहीरपणे म्हणतात देशाला दोन पंतप्रधान द्या, हे जनतेला मंजूर आहे का? काँग्रेसने जम्मू काश्मीरमधून अफस्पा कायदा हटवण्याचं आश्वासन दिलंय, ज्यामुळे आपले जवान हतबल होतील, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होतील.
-पाकिस्तानकडून पैसे घेऊन देशात फुटीरतावाद निर्माण करणाऱ्यांशी काँग्रेसला बातचीत करायची आहे.
-सर्जिकल स्ट्राईकवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले, 21 पक्षांनी मोदीच्या विरोधात प्रस्ताव पारित केला, तेव्हाच काँग्रेसच्या ढकोसलापत्राची सुरुवात झाली होती.
-फक्त दहशतवादच नाही, तर देशात भ्रष्टाचार वाढवण्यातही काँग्रेसचा हात, देशाच्या सुरक्षेसंबंधीत दलाली खाणंही यांना आवडतं, जेवढा मोठा व्यवहार, तेवढी मोठी मलाई
-इटलीच्या ज्या मिशेल मामाला नामदारांनी पळून लावलं होतं, त्याच्यासह त्याच्या साथीदारांनाही या चौकीदाराने दुबईतून पकडून आणलंय.
-काँग्रेसचे कारनामे पिढ्यानपिढ्या एकसारखेच आहेत, भ्रष्टाचार हा काँग्रेसला वारसाहक्काने मिळालाय, नामदार आज जामिनावर बाहेर आहे, तर काही माजी मंत्री कोर्टाच्या फेऱ्या लावत आहेत.
-परिस्थिती एवढी वाईट झालीय, की काँग्रेसच्या नामदाराने देशातल्या कोपऱ्यात एक असा मतदारसंघ शोधलाय, जिथे अल्पसंख्यांक आहेत
-नामदारांनी शोधलेल्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे, तिथली परिस्थिती सोशल मीडियावरचे फोटो पाहून समजते, तिथे काँग्रेसचे झेंडे शोधावे लागत होते.
-काँग्रेसची अवस्था बुडत्या जहाजासारखी झालीय, जे या जहाजात बसतील, ते राष्ट्रवादीसारखे बुडतील
-महाराष्ट्रात या लोकांनी ‘आदर्श’ सोसायटी बनवण्याचा प्रयत्न केला होता, शहिदांच्या कुटुंबीयांना धोका दिला होता
-देश चालवण्यात सर्वात मोठा वाटा मध्यमवर्गीयांचा आहे, पण काँग्रेस या वर्गाला शत्रू समजते, काँग्रेसच्या पूर्ण ढकोसलापत्रात मध्यमवर्ग या शब्दाला उल्लेखही नाही
-काँग्रेसचा इतिहास पाहा, हा पक्ष जेव्हा संकटात येतो, तेव्हा जुन्या आश्वासनांचा पाऊस पाडतो, पण आज काय परिस्थिती आहे पाहा
यांनी गरीबांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं, पण पुन्हा गजनी झाले, पण आम्ही कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता गरीबांना आरक्षण दिलं
-बंजारा समाजाची काँग्रेसने कधीही आठवण काढली नाही, पण आमच्या सरकारने पहिल्यांदाच भटक्या जातींसाठी योजना आणली
2019 मध्ये तुमचं मत दहशतवाद संपवण्यात मोठी भूमिका निभावणार आहे, चौकीदाराला आणखी मजबूत करा, कमळाचं बटण दाबाल तेव्हा तुमचं मत थेट मोदीला मिळेल.